माझे शिक्षण बीई इंजीनियरिंग पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षण लोहारा येथे पूर्ण झाले.  10वी मध्ये चांगले गुण मिळाल्याने माझा नंबर यवतमाळ येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनमध्ये लागला होता. तिथे माझा डिप्लोमा पूर्ण झाला व नंतर माझे लग्न झाले. शिक्षणामध्ये एक वर्षाचा गॅप पडला होता. पुढील शिक्षण घेण्याचा विचार आम्ही केला परंतु पदरी एक मूल घेऊन शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे कठीण होते. परंतु माझ्या आई-वडिलांच्या व पतीच्या आग्रहाने प्रयत्न केल्यावर  औरंगाबाद येथील देवगिरी इंजिनीअरिंग महाविद्यालयात माझा नंबर लागला. उत्साहाच्या भरात आम्ही औरंगाबाद येथे येऊन ऍडमिशन पूर्ण केले खरे, पण माझी परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी कॉलेजची फी भरू शकत नव्हते. या परिस्थितीत माझी ओळख आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्याशी झाली. भाऊंनी माझ्याशी संवाद साधून माझ्या परिस्थितीचा आढावा घेऊन माझी आर्थिक अडचण समजून घेतली व माझ्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. तसेच खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये व प्रत्येक वर्षी लागणारी पुस्तकेही मोफत दिली. माझ्याकडे भाऊंबद्दल बोलण्यास शब्द अपुरे आहे. जणू एक देवरूपी माणूस मला त्यांच्या रुपाने भेटला.  मला व माझ्या पतीला भाऊंनी चांगली नोकरी मिळवून दिली. आम्ही दोघेही सध्या औरंगाबाद येथे चांगल्या पदावर काम करत आहे. आदरणीय भाऊ खरंच तुम्ही साथ दिली नसती तर आज आम्ही काहीच नसतो..

रिजवाना हमीद शेख,

मु. लोहारा, जि. उस्मानाबाद.